मसला खुर्द—तुळजापूर तालुक्यातलं एक छोटं गाव. मातीच्या भिंती, कुडाचं छप्पर, आणि अंगणात चिंचेचं झाड. माझं बालपण याच साधेपणात, पण निसर्गाच्या सान्निध्यात घडलं.—एक गरीब शेतकरी, पावसावर अवलंबून शेती, वर्षभर कष्ट, आणि तरीही हातात फारसं काही उरत नसे. पण त्या जमिनीशी जोडलेली माणसं, श्रमाचं मोल, आणि निसर्गाशी असलेलं नातं मला आतून घडवत होतं. मामाच्या सासुरे गावी मामाबरोबर जनावरं चरायला जाताना माळरानावर पक्ष्यांचं एक वेगळंच जग दिसायचं. माळचिमणी म्हणजेच लार्क्सच्या चिवचिवाटात, टिटवीच्या सावध नजरेत, आणि कोल्हेकुईच्या गूढ अस्तित्वात काहीतरी बोलवणं होतं. त्या आवाजांनी मला शिकवलं—शब्दांशिवाय, पण गहिरं.

रस्ते नव्हते तेव्हा भूमीचं एक वेगळंच रूप होतं. लहानपणी मी आजोबांसोबत शेतावर जायचो, काळवीटांच्या हल्ल्यांपासून पिकं वाचवायला. शेत गाठणं सोपं नव्हतं—मातीचे कच्चे रस्ते, वाऱ्यात डुलणारी उंच ज्वारी, आणि काळोख्या रात्रीचं गूढ आवरण. आम्ही फक्त चालत नव्हतो, ऐकत होतो—पानांची सळसळ, लांबून येणारा कोल्ह्याचा आवाज, आणि भूमीचा धपकारा. खेळ साधे पण रानवटे होते: गावाच्या तलावात पोहणं, मित्रांसोबत सुर परंब्या खेळणं, आणि बैलगाडीत स्वार होणं. शेतात जनावर चारायला येणारे, शेत कुळवताना आणि नांगरताना गायलेली त्यांची गाणी, त्यांच हास्य, त्यांची जीवनशैली—सगळं मातीसही एकरूप असल्यासारख वाटायचं. आणि मग होता देवीचा माळ — आई तुळजा भवानी देवतेचं पवित्र स्थान. तिथं पोहोचायला तास लागायचे, लवणातून चढ-उताराच्या शेतातून चालत जायचं. आज ती फक्त पाच मिनिटांची गाडीची वाट झाली आहे. रस्त्यांनी अंतर कमी केलं, पण शांतता लांबवली. तेव्हा फारसं कुणी त्या दूरच्या शेतांमध्ये पीक घ्यायला तयार नव्हतं. आता वाहनं आणि रस्ते आहेत, म्हणून तीच शेतं प्रचंड महाग झाली आहेत आणि त्यातपण चढाओढ तिथला विकास करण्याची.

शाळा सोलापूरमध्ये झाली. अभ्यासात सुरुवातीला फारसा रस नव्हता. पण एकदा शाळेतून दट्ट्या बसल्यानंतर काहीतरी बदललं. आईने कधी “शास्त्रज्ञ” होण्याचं स्वप्न पाहिलं नव्हतं, पण तिने मला थांबवलं नाही. तिच्या ठिंब्यामुळे मी प्राणीशास्त्रात मास्टर्स पूर्ण केलं. आणि मग ठरवलं—पीएच.डी. करायची, तीही डेक्कनच्या गवताळ प्रदेशात. जिथे माझं बालपण गेलं, तिथेच पक्ष्यांच्या अधिवासांचा अभ्यास करायचा. माझ्या पीएच.डी.चा प्रवास सोपा नव्हता. मार्गदर्शक डॉ. असद रहमानी यांनी सुरुवातीला नकार दिला आणि म्हणाले “तू अजून परिपक्व नाहीस.” पण शिस्त, अभ्यास, आणि संवेदनशीलतेच्या जोरावर मी स्वतःला पीएचडी साठी सिद्ध केलं. नंतर त्यानीच शाबासकी ची थाप दिली जी की आयुष्याची शिदोरी बनली. शिस्त, अभ्यास, आणि संवेदनशीलतेच्या जोरावर मी स्वतःला सिद्ध केलं. डेक्कनच्या पक्षीजीवनाचा अभ्यास करताना मला जाणवलं की ग्रेट इंडियन बस्टार्ड (GIB) हा पक्षी आता ९०% भागातून नामशेष झाला आहे. २००५ मध्ये त्यांची संख्या ३५०–४०० होती, तर २०१३ मध्ये ती २००–२५० पर्यंत घसरली. २०१० मध्ये नान्नज मार्डी क्षेत्रात २५ ची असणारी संख्या २०१७ मध्ये फक्त एक मादी पर्यन्त उरली. नान्नज आणि करमाळा भागात लहान लोकसंख्या असून, नान्नजला २००४ मध्ये IBA म्हणून घोषित करण्यात आले. BNHS ने १९८०–९० च्या दशकात अभ्यास केला, पण २००५ नंतर दीर्घकालीन अभ्यास झाला नाही. डेक्कनचा दक्षिण-पश्चिम भाग—पश्चिम घाटाच्या कुशीत आणि सातपुडा पर्वतरांगांच्या सावलीत—अर्धशुष्क जैवप्रदेश, उघडी झुडपे आणि काटेरी जंगलांनी भरलेला. एकेकाळी पक्ष्यांनी गजबजलेला हा प्रदेश, आता झपाट्याने झालेल्या विकासामुळे तुकडे तुकडे झाला आहे. जेथे माळढोकचे पावलांचे ठसे दिसायचे, तेथे आता औद्योगिक बोर्ड लागलेले दिसतात. जेथे लार्क्सच्या गाण्यांनी दुपार भरायची, तेथे आता ट्रकचे हॉर्न ऐकू येतात. हे बदल केवळ पर्यावरणशास्त्रीय नव्हते—ते वैयक्तिक होते.

मी नान्नज अभयारण्य आणि सभोवतालच्या डेक्कन पठारावर २८२ पक्षीप्रजातींची नोंद केली. त्यात १४ संकटग्रस्त आणि ८ निकट संकटग्रस्त प्रजाती होत्या. माळढोकवर विशेष भर दिला. पण माळढोकचं अस्तित्व केवळ आकडेवारीत उरलं होतं. त्यांच्या अनुपस्थितीनेच त्यांच्या अस्तित्वाची जाणीव होत होती. मी चंडोल, भारतीय धाविक म्हणजे इंडियन कोरसर, आणि चेस्टनट-बेलीड सॅंडग्रोस म्हणजेच ‘पखुरडी’ सारख्या प्रजातींचा सखोल अभ्यास केला. ऋतूनुसार पक्षी वैविध्यतेतील बदल, प्रति तास आढळण्याचा दर, आणि थव्याचा आकार याची माहिती संकलित केली. नान्नज-मारडी परिसरातील एक चौ.कि.मी. गवताळ क्षेत्र निवडून चंडोल म्हंजेच लार्क्सच्या प्रजननाचा अभ्यास केला. तसेच ३०० हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र असलेल्या १४ निवडक गवताळ अधिवासांवर औद्योगिक प्रकल्पांचे स्थान नकाशावर अधोरेखित केले.

हा प्रवास BNHS च्या माध्यमातून एक व्यापक चळवळ बनला. सुरुवातीला मी एक फील्ड संशोधक म्हणून काम करत होतो. नान्नज, मार्डी, हिप्परगासारख्या ठिकाणी पक्ष्यांचे व्यवहार आणि अधिवास अभ्यासले. बस्टार्डच्या हरवलेल्या पावलांमागे चालताना त्यांच्या अनुपस्थितीनेच त्यांच्या अस्तित्वाची जाणीव होत होती. हळूहळू माझं काम हस्तक्षेपात्मक बनत गेलं. पोखरण (राजस्थान) येथे ११०० हेक्टर आणि बीदर (कर्नाटक) येथे ४० हेक्टर क्षेत्र पुनर्स्थापित केलं. खिचन संरक्षित क्षेत्र जाहीर करण्यासाठी धोरणात्मक काम केलं. डेमॉइसेल क्रेनच्या संरक्षणासाठी उच्च न्यायालय समितीवर BNHS चे प्रतिनिधित्व केलं. क्रेन संमेलन, विद्युत वाहिन्यांमुळे होणाऱ्या मृत्यूंचे विश्लेषण, आणि GIS आधारित नकाशे तयार केले.
मी स्थानिक युवक, गावकरी, आणि वन विभागाचे अधिकारी यांना प्रशिक्षण देत एक सहभागी संवर्धन मॉडेल उभं करण्याचे प्रयत्न करतो आहे. कथा, दृश्य माध्यमं, आणि भावनिक संवाद यांचा वापर करून विज्ञान सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आहे. MoU तयार केले, प्रस्ताव लिहिले, आणि संवर्धनासाठी बजेट आखणी केली. आज BNHS मध्ये मी Deputy Director आणि Bustard–Florican Program Lead म्हणून काम करत आहे. माझं काम धोरण, अधिवास पुनर्स्थापना, युवक सक्षमीकरण, आणि राष्ट्रीय स्तरावर संवर्धन मॉडेल तयार करणं यावर केंद्रित आहे.


या सगळ्या प्रवासात, माझ्या कुटुंबाने आणि संस्थेने मला साथ दिली. मुंबईहून राजस्थानात स्थलांतर करून त्यांनी माझ्या कामात सक्रिय सहभाग घेतला. माझ्या मुलीला मी जेव्हा गवताळ प्रदेशात घेऊन जातो, तेव्हा मला वाटतं—ही केवळ संवर्धनाची नाही, तर पिढ्यांमधून चालणाऱ्या जाणीवेची चळवळ आहे. —पण या सगळ्याच्या मुळाशी एकच भावना होती: माळरानांच्या पंखांना पुन्हा आकाश द्यायचं.
तरुण संशोधकांसाठी एक संदेश

तुम्ही कुठूनही येऊ शकता—मसला खुर्दसारख्या छोट्या गावातून, शेतकऱ्याच्या घरातून, किंवा शहराच्या गजबजाटातून. पण जर तुम्हाला निसर्गाशी नातं जोडायचं असेल, तर त्या नात्याला अभ्यास, संवेदनशीलता आणि कृतीची जोड द्या. संवर्धन म्हणजे केवळ पक्ष्यांना वाचवणं नाही—तर त्यांच्या आठवणींना, त्यांच्या अस्तित्वाच्या खुणाना जिवंत ठेवणं.
काय करू नये हे समजून घेणं म्हणजेच संवर्धनाची खरी सुरुवात
निसर्ग संवर्धन ही केवळ कृतींची मालिका नाही, तर ती एक विचारसरणी आहे. “काय करावं” यावर भर देताना अनेकदा आपण अति-उत्साही उपाय राबवतो—जसे की वृक्षारोपण, संरक्षक कुंपण, जलसाठे इ. पण प्रत्येक उपाय सर्व ठिकाणी योग्यच असेल असं नाही. म्हणूनच “काय करू नये” हे ओळखणं अधिक महत्त्वाचं ठरतं. माळरान म्हणजे उघड्या, कोरड्या, गवताळ जमिनी—जिथे गवत, झुडपे आणि स्थानिक जैवविविधता नैसर्गिकरीत्या विकसित होते. अशा ठिकाणी झाडं लावणं म्हणजे त्या पारिस्थितिक तंत्राला बाधा पोहोचवणं. हे bustard आणि florican सारख्या गवताळ पक्ष्यांसाठी घातक ठरू शकतं. वृक्षारोपण हे पर्यावरणासाठी चांगलं असलं तरी योग्य ठिकाणी आणि योग्य पद्धतीनेच करावं लागतं. संवर्धन हे केवळ वैज्ञानिक किंवा प्रशासकीय उपक्रम नसतो—तो लोकांचा उपक्रम असतो. स्थानिक लोक, शेतकरी, चरवाहे, महिला, तरुण—हेच त्या परिसराचे खरे संरक्षक असतात. त्यांचा सहभाग, अनुभव, आणि भावनिक नातं निसर्गाशी जोडलेलं असतं. त्यांच्या विना केलेला कोणताही आराखडा तात्पुरता आणि अपूर्ण ठरतो. संवर्धनाच्या वाटचालीत अपयश अपरिहार्य आहे—पण हे अपयश म्हणजे शिकवण आहे. त्यातून आपण पुढच्या टप्प्याला अधिक सजग, अधिक समावेशक, आणि अधिक परिणामकारक होतो. अनुभवाची शिदोरी हीच पुढच्या यशाची गुरुकिल्ली ठरते.